🕋 डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे मुस्लिमविषयक विचार 🧔🏻
संकलन: इंजी. सुरज तळवटकर.
काही वर्षापूर्वीच संघपरिवाराच्या लाडक्या विचारवंतांनी बाबासाहेबांची बदनामी करुन त्यांना खलनायक बनविले आहे. आज भाजपाने स्वतःचा मार्गच बदलला अाहे. त्यांनी डाॅ.बाबासाहेबांना प्रातःस्मरणीय व्यक्तींमध्ये समाविष्ट केले आहे. एवढेच नव्हे तर हिंदू धर्माचे समर्थक, मुस्लिमविरोधी आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारे प्रखर राष्ट्रवादी अशी त्यांची प्रतिमा निर्माण केली जात आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे मुस्लिमविरोधी होते असा प्रचार करुन जो वाद निर्माण केला आहे, त्यात काहीच नवीन नाही. कारण डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना हिंदुत्ववादी चौकटीत बसविण्याचे संघप्रणीत कारस्थान किमान गेल्या तीन दशकांपासूनच सुरु आहेत.
इस्लामचे गाढे अभ्यासक व समकालीन जमातवादाचे भाष्यकार म्हणून प्रसिध्द असलेले विश्लेषक, डाॅ.असगर अली इंजिनियर यांनी डाॅ.बाबासाहेब कसे मुस्लिमविरोधी नव्हते हे स्पष्टपणे दाखवले आहे. डाॅ.इंजिनियर यांचे यांचे हे मत मुस्लिम समुदायाचे बाबासाहेब अांबेडकरांविषयक प्रातिनिधीक मत म्हणून पाहता येईल. संघोट्यांचे पोकळ दावे समर्थपणे खोडून काढण्यासाठी बाबासाहेबांच्याच मूळ लेखनाचा आधार घेऊन ‘वस्तुस्थिती’ लोकांसमोर मांडणे आवश्यक आहे. असत्य प्रचाराची खोडसाळ क्षमता पाहता त्याला मूळासकट खोडून काढण्याची आवश्यकता आहे.
प्रारंभीच्या काळापासूनच डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखानात इस्लाम आणि मुस्लिम संबंधित संदर्भ येतात. ‘बहिष्कृत हितकारिणी सभेचे’ मुखपत्र असलेल्या ‘बहिष्कृत भारत’ या आपल्या वृत्तपत्रात डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातील समाजसुधारक लोकहितवादी यांची ‘इस्लाम’ वरील लेखमाला छापली होती. बाबासाहेब जर इस्लामविरोधी व मुस्लिमविरोधी असते, तर महत् प्रयासांनी सुरु केलेल्या आपल्या वृत्तपत्रातील महत्वाची जागा त्यांनी इस्लामसारख्या विषयावर खर्च केली नसती. इस्लाममधील समतावादी तत्वांमुळे बाबासाहेब आंबेडकर निश्चितच प्रभावी झाले होते, व हिंदूधर्माच्या संपर्कामुळे अनिष्ट बाबींचा शिरकाव होऊन भारतात इस्लामची जी अवनती झाली त्याबद्दल बाबासाहेबांना खंत वाटत होती. त्यांनी अनेक ठिकाणी अवनतीबद्दल भाष्य केले आहे आणि हिंदू धर्मालाच त्यासाठी जबाबदार ठरवले आहे. इस्लाममधील दृढ ऐक्याच्या भावनेची त्यांनी नेहमीच तारीफ केली आहे. मुस्लिम समुदायातील एकसंघतेमुळे ते भारावून गेले होते, याचा प्रत्यय त्यांच्या लिखाणात अनेक ठिकाणी येतो.
१९३५ साली येवला येथे ‘मृत्यूपूर्वी हिंदू धर्माचा त्याग करून नव्या धर्माचा स्वीकार करेन’ अशी घोषणा केल्यानंतर त्यांच्या काही अनुयायांनी धर्मांतर करण्याचे ठरवून त्यांची भेट घेतली असता बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना इस्लामचा स्वीकार करण्याचा सल्ला दिला होता. धर्मांतर करण्याची इच्छा असल्यास इस्लामचा स्वीकार करा असे अाग्रही प्रतिपादन त्यांनी ‘बहिष्कृत भारत’ मधून केले होते. (१५ मार्च १९२९) आपल्या ध्येयाच्या संदर्भात विविध धर्मांचा सखोल अभ्यास केल्यानंतरच त्यांनी बौध्द धम्माविषयक निर्णायक मत बनविले होते. त्यामुळे ‘डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे मुस्लिविरोधी होते’ असं म्हणणे किती खोडसाळपणाचे आहे याची कल्पना येईल.
भाग:- तीन
#समाप्त